Posts tagged Marathi weekly column

टिपटिप की रिपरिप(Tiptip Ki Riprip)

रखरखीत जमिनीवर अचानक कोसळणाऱ्या पावसाबरोबर येणारा मातीचा सुगंध, आपसूकच गावाकडं घेऊन जातो. वय वीस-एक वर्षांनी कमी होतं, पाण्याबरोबर वाहणारे रस्ते आठवतात. मातीत पडणाऱ्या गारा गोळा करून खाण्यातली मजा आठवते.

दप्तर भिजू नये म्हणून ढगळा रेनकोट दप्तरावरून चढवून बागुलबुवाचा अवतार करून शाळेला जाण्यात एक वेगळीच गम्मत होती. घरी परत येताना पायाला पाणी लागू नये म्हणून घातलेल्या ‘गमबूटात’ एखाद्या डबक्याजवळ थांबून पाणी भरायचं आणि मग त्यात पाय घालून ‘पचपच’ आवाज करत चालत जायचं – ह्याला एक वेगळी बुद्धिमत्ता लागते. असो!

पावसाचा तसा त्रास कधी वाटला नाही. गावी असताना तरी नाही. पण शहरात कधी कधी पाऊस देखील ९ ते ५ करून वैतागल्या सारखा वागतो. रस्ते निसरडे करून accidents करून ठेवतो, ट्रॅफिक ला ‘जॅम’ करून ठेवतो. ‘कोरडेपणा’ची सवय झालेल्या नद्यांना कळत नाही आता पाण्याचं काय करायचं. रस्त्यांचं bladder तर लगेच फुल्ल होऊन जातं.

तरीही ह्या सगळ्या पांढरपेशी अडचणी.

मध्ये एकदा ‘नागराज मंजुळे’ ह्यांची ‘पावसाचा निबंध’ ही शॉर्टफिल्म पाहण्यात आली. धो-धो कोसळणारा पाऊस, शाळेत ‘पावसावर निबंध’ लिहून आणायला सांगितलेला मुलगा, त्याची छोटी बहीण, दारुडा बाप आणि घराला हातभार लावता लावता वैतागलेली आई ह्यांची ती गोष्ट आहे.

ती फिल्म आता पाऊस बघताना हमखास आठवते.

त्यांनतर, काही वर्षांपूर्वी जेव्हा कामवाल्या मावशींनी ‘घराचा पत्रा उडाला’ म्हणून सुट्टी मारली होती, ते सहानुभूतीने ऐकून घेतलं नव्हतं, ते आठवून लाज वाटते.

पाऊस प्रत्येकासाठी वेगळा आहे. कुणाला त्याची टिपटिप धुंद करून टाकते तर कोणी त्याच्या रिपरिपीला त्रासलेला असतो. एखाद्या प्रेमात पडलेल्याला रोमांचक तर दुसऱ्यासाठी विध्वंसक.  कुणासाठी सुंदर आठवणींचा पूर आणि कोणाला पाण्याखाली गेलेलं शेत बघताना डोळ्यातलं पाणी लपवायला आधार.

हा पाऊस एखाद्यासाठी बाष्पीभवनाची प्रक्रिया असेल, तर दुसऱ्यासाठी इंद्रदेवाची कृपा.

ज्याच्यासाठी जसा आहे तसा आहे. आपण गरम चहाचा कप हातात धरून फक्त इतकंच करू शकतो, खाली येणारा थेंब प्रत्येकासाठी सुख घेऊन येवो अशी प्रार्थना!

कानोसा (Kanosa)

लेखक Neil Gaiman ह्यांचा एक किस्सा आठवतो. त्यात ते म्हणतात,”माझी एक लांबची बहीण जी आता जवळपास ९० वर्षाची आहे. ती आणि तिच्या मैत्रीणीना वर्ल्ड वॉर २ मध्ये शिवणकामचं काम दिलं होत. त्याकाळात कुणाकडे पुस्तक सापडलं तर त्याला सरळ मृत्यूची सजा व्हायची. अशा काळात हया मुलीला ‘Gone with the Winds’ पुस्तक हाती मिळालं होत. मग केवळ ४ तास झोप घेऊन उरलेल्या काही तासात ती ते पुस्तक रोज थोड वाचायची आणि काम करताना आपल्या मैत्रिणींना त्यातली गोष्ट सांगायची.ह्या मुली एका ‘स्टोरी’ साठी जीवाशी खेळत होत्या. हे ऐकून मला जाणवलं की मी करतोय ते काम खरंच महत्वाचं आहे. Because giving people stories is not a luxury, it’s actually one of the things to live and die for.”
भारतात तर कथा- कवितांना पुरातन काळापासून महत्त्व आहे. अत्यंत जटिल गोष्ट केवळ एका कथेच्या साह्याने कशी सोप्याने सांगता येते ह्याचं उत्तम उदाहरण आपली महाकाव्य आहेत.
गोष्टी खरंच प्रभावी असतात, त्या आपल्याला जाणीव करून देतात की आपण ‘एकटे’ नाही. कधी त्या आपल्याला काही खूप मोठा मतितार्थ समजावून जातात. कधी दुःखावर फुंकर घालून जातात, न बोलता उपदेश देऊन जातात. Viral झालेलं ‘मिम्स’ म्हणजे दुसर काय आहे ‘Mini stories’ च तर आहेत. आपल्यासारखचं विचार करणार, वागणार अजूनही कोणी आहे म्हणजेच ‘relatable’ वाटल्यामुळेचं तर त्यांना तुफान popularity मिळलीय.
आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात छोट्या मोठ्या ‘किस्स्यांना’, लहानपणी ऐकलेल्या गोष्टींना, घरातल्या आजी किंवा आजोबांच्या अनुभवांना फार महत्त्व आहे. ‘You are what you eat’ ह्यामध्ये कानाने खाणे, डोळ्याने खाणे हे देखील आलचं.
‘कानोसा’ ह्या कॉलम मधून अशाच काही गोष्टी, किस्से, अनुभव तुमच्या भेटीला आणणार आहोत. Stay tuned!