Posts tagged Kanosa

नागरिकशास्त्र (Nagarikshastr)

सातवीचा वर्ग, एक तास संपून दुसरा तास सुरु व्हायची मधली वेळ. त्या वेळात वर्गात किलकिलाट सुरु. मुलींची शाळा तर साहजिकच बोलायला विषय खूप असायचे.  वर्गाची “Class Representative” असूनही मी आणि माझ्या मैत्रिणीच्या गप्पांनाच ऊत आलेला. तशा वर्गातल्या सगळ्या मुली मैत्रिणीच. पण त्यात हि माझी खास मैत्रीण. आमच्या गप्पांना खंड नसायचा. शिक्षक वर्गावर आले तरी वहीवर लिहून गप्पा continue व्हायच्या.

असा साधारण scene असताना नागरिकशास्त्राचे सर वर्गात शिरले. “Goooood Afternoooon Siiiir!” असं उठून आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि बेंचवर बसलो.  काही शिक्षकांना तुकडी अ आणि तुकडी ब ह्यांना एकत्र करून syllabus संपवायचा होता. त्यामुळे एका बेंचवर तीन मुली बसल्या होत्या.

सरांनी नवीन धडा उघडायला सांगितलं आणि ते पुढे वाचू लागले. अचानक ते थांबले. आणि आम्हाला आडनावाने हाक मारून उभं केलं.

सर म्हणाले, “तुम्हाला काय वाटतं. तुम्ही चांगल्या घरातून येता म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांना कसंही वागवायचा अधिकार आहे?”

आम्हाला दोघींना काही कळेना. मग सरांनी माझ्याकडे मोर्चा वळवला. माझं आणि ह्या सरांचं फार पटायचं नाही. शाळेत असताना ‘खेळा’त सोडून सगळ्या गोष्टींत मी पुढे असायचे, तर ते त्यांना फारसं आवडायचं नाही. कदाचित त्यांना असं वाटत असेल कि माझ्यामुळे बाकीच्यांना संधी मिळत नाही. त्या दिवशी देखील ते अशाच अर्थाचं काहीतरी म्हणाले, “काय महाजन, काय वाटतं तुला? की तू नंबर काढतेस तर तू दुसऱ्यांशी कशीही वागू शकतेस?”

माझ्या डोळ्यात पाणी आलं, मी त्यांना विचारलं, “सर काय झालं? मी काय केलं?”

सर मैत्रिणीला म्हणाले, “तू तिथेच थांब आहेस त्या ठिकाणी.” आणि मला पुढे फळ्याजवळ  बोलवलं. मग ते म्हणाले, “आता इथून बघ काय दिसतंय, ती हणबरवाडीची मुलगी, ती कुठे बसलीय, आणि तुम्ही दोघींनी किती जागा घेतली आहे.”

मी बघितलं तर ती तिसरी मुलगी बेंचच्या एका कोपऱ्यावर बसली होती, आणि आमच्या गप्पांमध्ये मी आणि माझ्या मैत्रिणीने कधी २/३rd पेक्षा जास्त जागा घेतली होती ते आम्हाला कळलं नव्हतं.

मी डोळ्यातून गळणारं पाणी कसंबसं थांबवण्याचा प्रयत्न करून सरांना म्हणाले, “आम्ही मुद्दाम केलं नाही सर… आम्हाला कळलं नाही. तिने सांगितलं असतं तर आम्ही सरकून बसलो असतो.”

“हो… पण ती सांगणार कशी? वर्गातल्या फार शहाण्या मुली ना तुम्ही”

मी बाकावर कोपऱ्यात जाऊन बसले. तिसऱ्या मुलीला नीट जागा करून दिली आणि तो क्लास व त्यानंतरचे उरलेले क्लास खाली मान घालून नोट्स घेत संपवले.

घरी जाऊन हे सांगितलं तर आई म्हणाली, “उद्यापासून तू नीट बघून बसत जा.”

खूप वर्षांनी तो प्रसंग पुन्हा आठवला.

मला तेव्हा सरांचा राग आला होता खरा, आणि कदाचित सरांची सांगण्याची पद्धत चुकीची होती. किंवा बरोबरच असेल. काही अनुभव कडू लागल्याशिवाय मनावर कोरले जात नाहीत.

पण ते सांगत होते त्यात तथ्य होतं. आमच्या बाकावर बसलेली ती मुलगी एस.टी पकडून शाळेला येत असे. एवढंच नाही तर घरी भांडी-धुणी अशी कामं करत असे. ती स्वतःहून बहुधा आम्हाला बेंचवरच्या अडचणीबद्दल बोलली नसती.

आता लक्षात येतं की, बऱ्याचदा आपल्या bubble मध्ये राहून आपण दुसऱ्याला समजून घेण्यात कमी पडतो. स्वतःच्या जगात गुरफटून जाऊन दुसऱ्याबद्दल अनास्था कधी निर्माण होऊन जाते कळत नाही.
आणि आता त्या अनास्थेला सोशल मीडियाने छान फोडणी देऊन सजवलं आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल, विषयाबद्दल खोल माहिती नसताना त्यावर ‘कमेंट’ करण्याचं शस्त्र लोकांना मिळालं आहे. स्मार्टफोन व स्वस्त इंटरनेट वापरून अनेक ‘इंटरनेटवीर’ दर मिनिटाला जगाशी ‘विसंवाद’ साधत असतात. दुसऱ्याला समजून घेण्याची किंवा एखाद्या विषयाबद्दल पूर्णतः जाणून घेण्याची गरज उरली नाहीए. कुठल्याही व्यक्तीविषयी assumptions करून गरळ ओकण्याची मुभा मिळाली आहे.

दुसऱ्याला काय वाटेल ह्याचा तिळमात्र विचार न करणारी ही लोकं बघून असे काही स्वानुभव आठवतात.

असे अनुभव प्रत्येकाच्या गाठीला असतीलच असे नाही. पण दुसऱ्याच्या बूटात चालून कसं वाटतं हे आपल्याला माहित नाही, ह्याची फक्त जाणीव असणं पुरेसं आहे.
आपण बसलेल्या बाकावर स्वतः किती जागा घेऊन बसलोय हे पाहिलं तरी पुरेसं आहे.

उतू नकोस मातू नकोस (Utu Nakos Matu Nakos)

“मम्मा, उतू-मातू म्हणजे काय?” ईशानने फरशीवर गाडी फिरवत फिरवत विचारलं.

“काय्य?” मी केस विंचरताना थबकले.

“तू नाहीस का काल म्हणत होतीस, उतू नको, मातू नको…” त्याने मग माझ्याकडे पाहिलं.

“oh… ते… उं… उतू नकोस, मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस.”

“हां, म्हणजे काय?”

आता काय सांगायचं ह्याला? इंग्लिश शाळेत शिकणारी ही मुलं. काय अर्थ सांगावा? तसा मला तरी कुठे उतू-मातूचा इंग्लिश शब्द माहित आहे म्हणा…!
तसं फार काही व्रतं-वैकल्य मला जमत नाहीत. पण लॉक-डाऊन मध्ये घरी राहिल्याने, सोसायटीतल्या शेजारणींच्या नादाने मीदेखील सण-वारात इंटरेस्ट घेऊ लागलेय. मग सासूबाईंच्या virtual देखरेखीखाली पूजा मांडतेय ‘महालक्ष्मी’ची. काल दुसरा गुरुवार झाला. लहानपणी ही कथा वाचायला नेहमी मी पुढे असायचे. चांगले आवाजातले चढउतार घेऊन.

आटपाट नगर होते. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शुर व प्रजादक्ष होता. देवा-ब्राम्हणांना, साधुसंतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवर्‍याशी भांडण होई. भांडणानं वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करत होत्या, लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनही व्रत केलं. दुःख विसरली. दारिद्र्य गेलं. परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला; पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऎश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. एकदा काय झालं. देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं. मागच्या जन्माची आठवण द्यावी.
देवीनं म्हातारीचं रुप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली. माथी मळवट फासला. हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली – “अरे, आहे कां घरात कुणी ? कुणी घास देईल का ?” दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, “कोण गं तू ? आलीस कुठनं ? काय काम काढलं आहे ? तुझं नाव काय ? गाव कोणतं ? तुला हवयं कायं ?” मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, “माझं नाव कमला. द्वारकेहून आलेय गं ! राणीला भेटायचंय ! कुठं आहे गं राणी?

सुरतचंद्रिका दासीचा निरोप ऐकून बाहेर आली. ती तावातावाने म्हणाली, “कोण गं तू थेरडे? इथे कशाला आलीस ?”

हे ऐकून म्हातारी संतापली. “सुरतचंद्रिके, तुला तुझ्या संपत्तीचा गर्व झाला आहे, तुला तुझ्या भूतकाळाचा विसर पडला आहे. तू जा म्हणण्याआधीच मी निघाले.” असे म्हणून म्हातारी काठी टेकीत चरफडत निघाली. वाटेत तिला राजाची कन्या शामबाला दिसली….

हि गोष्ट वाचता वाचता मला ती म्हातारी दिसायची. सुरतचंद्रिका म्हणजे एखाद्या जुन्या हिंदी सिनेमातील vamp वाटायची. वाचताना कधी असा विचार वगैरे केला नव्हता. कि ह्याचा अर्थ काय? खरंतर कालही वाचताना केला नव्हता.

पण कुठे ना कुठे ती गोष्ट मनात होती. आजकालच्या मुलांसारखं ‘Value education’ वगैरे मिळत नव्हतं आम्हाला शाळेत. ‘मुलांचे संगोपन’ ह्या विषयावर आईनं तरी कधी पुस्तक वाचल्याचं आठवत नाही.

एके काळी कष्टात दिवस काढलेली आम्ही भावंडं आता सामाजिक अर्थाने चांगली सेटल्ड आहोत. पण माझ्या आणि माझ्या भावंडांच्याही मनात कुठेतरी जाणीव आहे, की हे दिवस कुणाच्या तरी कष्टामुळे आलेयत. आणि तेच कष्ट आपणही केले तर कुठे चांगले दिवस टिकून राहतील आणि मुलांच्या वाट्यालाही तेच सुख राहील.

हाच असावा त्या गोष्टीचा अर्थ. व्रत, पूजा, उपास ही सगळी निमित्त आहेत. वडिलधाऱ्यांकडून घेतलेला कष्टाचा वसा टाकून नाही द्यायचा, आणि अहंकाराला बाजूला ठेवायचं.

“मम्मा… मी थोडी कणिक घेऊ खेळायला?” ईशानचा किचनमधून आवाज आला.

“अरे! हा तिकडे कधी गेला” मी बेडवर बसून जो विचार करत होते त्यातून जागी झाले. आणि किचनकडे गेले. त्याने already थोडी कणिक घेऊन त्याचा हत्ती तयार करायला सुरुवात केली होती. उतू-मातू बद्दल तो विसरला होता.

जाऊ दे. काय सांगायचं त्याला. त्याच्या कानावर पडेल गोष्ट आणि कळेल अर्थ जेव्हा कळायचा!

कानोसा (Kanosa)

लेखक Neil Gaiman ह्यांचा एक किस्सा आठवतो. त्यात ते म्हणतात,”माझी एक लांबची बहीण जी आता जवळपास ९० वर्षाची आहे. ती आणि तिच्या मैत्रीणीना वर्ल्ड वॉर २ मध्ये शिवणकामचं काम दिलं होत. त्याकाळात कुणाकडे पुस्तक सापडलं तर त्याला सरळ मृत्यूची सजा व्हायची. अशा काळात हया मुलीला ‘Gone with the Winds’ पुस्तक हाती मिळालं होत. मग केवळ ४ तास झोप घेऊन उरलेल्या काही तासात ती ते पुस्तक रोज थोड वाचायची आणि काम करताना आपल्या मैत्रिणींना त्यातली गोष्ट सांगायची.ह्या मुली एका ‘स्टोरी’ साठी जीवाशी खेळत होत्या. हे ऐकून मला जाणवलं की मी करतोय ते काम खरंच महत्वाचं आहे. Because giving people stories is not a luxury, it’s actually one of the things to live and die for.”
भारतात तर कथा- कवितांना पुरातन काळापासून महत्त्व आहे. अत्यंत जटिल गोष्ट केवळ एका कथेच्या साह्याने कशी सोप्याने सांगता येते ह्याचं उत्तम उदाहरण आपली महाकाव्य आहेत.
गोष्टी खरंच प्रभावी असतात, त्या आपल्याला जाणीव करून देतात की आपण ‘एकटे’ नाही. कधी त्या आपल्याला काही खूप मोठा मतितार्थ समजावून जातात. कधी दुःखावर फुंकर घालून जातात, न बोलता उपदेश देऊन जातात. Viral झालेलं ‘मिम्स’ म्हणजे दुसर काय आहे ‘Mini stories’ च तर आहेत. आपल्यासारखचं विचार करणार, वागणार अजूनही कोणी आहे म्हणजेच ‘relatable’ वाटल्यामुळेचं तर त्यांना तुफान popularity मिळलीय.
आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात छोट्या मोठ्या ‘किस्स्यांना’, लहानपणी ऐकलेल्या गोष्टींना, घरातल्या आजी किंवा आजोबांच्या अनुभवांना फार महत्त्व आहे. ‘You are what you eat’ ह्यामध्ये कानाने खाणे, डोळ्याने खाणे हे देखील आलचं.
‘कानोसा’ ह्या कॉलम मधून अशाच काही गोष्टी, किस्से, अनुभव तुमच्या भेटीला आणणार आहोत. Stay tuned!

आटपाट नगरात (Aatpat Nagarat)

“आटपाट नगरात एक सावकार राहत असे. त्याला दोन बायका होत्या. एक आवडती, एक नावडती. आवडतीचे नाव रूपवंती, नावडतीचे नाव गुणवंती. रूपवंतीला आपल्या रूपाचा गर्व होता. सावकार तिच्यावर प्रेम करी, तिला रेशमी कापडं आणून देई. गुणवंती दिसायला काळी-सावळी, माहेर गरिबीचं. दिवसभर घरकाम करी आणि रात्री आपल्या
खोपट्यात झोपी. एके दिवशी लाकडं गोळा करून आणत असता, तिला एक म्हातारी लंगडताना दिसली . तिने जवळ जाऊन विचारपूस केली. म्हातारीच्या पायातला काटा काढून चिंधी बांधली. म्हातारीनं आशीर्वाद दिला आणि म्हणाली, “४ कोसावर उजव्या बाजूस तळं आहे. त्यात ३ डुबक्या मार तुझी मनीची इच्छा पूर्ण होईल.” गुणवंती तळ्याजवळ गेली देवाचे स्मरण करून ३ डुबक्या मारल्या. बाहेर आली. तर अंगावर रेशमी लुगडे, हातात सोन्याची कांकण, गळ्यात सोनसळी हार. पाण्यात पहिले तर रूप गोरेपान. तडक घरी गेली. सावकाराला ओळख पटेना. मग ओळख पटवून दिली. सावकाराला गुणवंतीची ओळख पटली. आणि गुणवंती सावकारासंगे सुखाने नांदू लागली.”

चांगलं आहे ना… तळ्यात डुबक्या काय मारल्या, गुणवंती गोरी काय झाली आणि सावकाराची आवड बदलली. काळ्या रंगाचा इतका कसला तिरस्कार ? आणि गोऱ्या रंगाचं वर्चस्व किती normalize करून ठेवलंय ह्या अशा गोष्टींनी. काही दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये Tea-time वेळी एका colleague ला विचारलं , “अगं चहा नाही आवडत तुला?”
तेव्हा हसत हसत ती म्हणाली, “लहानपणी मला सांगितलं होतं चहा प्यायलं की काळं होतो, मग तेव्हापासून मी चहा पीत नाही!”
लहानपणीच तिला तिच्या गोऱ्या रंगाबद्दल अभिमान ठसवण्याचा आला आणि काळ्या रंगाची भीती. आपली ही आठवण सांगताना ती हे देखील विसरली होती कि तिला हा प्रश्न विचारणारी मैत्रीण सावळी आहे.
कदाचित म्हणूनच आवडत नसेन मी ‘ह्याला’! माझ्या समोरच्या कॉफीच्या कपवरून नजर काढून मी ‘त्याच्या’कडे वळवली. “
तो”, माझ्या new hires च्या बॅचमधला माझ्यापेक्षा बराच उजळ रंगाचा बॅचमेट! हळू हळू चांगला मित्र झाला. आता अगदी ‘बेस्ट फ्रेंड’ चं लेबलही लागलंय. त्यापलीकडे काही नाही होणार. मला कुठं मिळणार आहे तसलं तळं!? कितीही इच्छा असली तरी स्वतःहून विचारायला मन धजावत नाही. त्याने नकार तिला तर माझं मन खूप खूप तुटेल. कसल्या विचारत इकडे-तिकडे बघतोय कोण जाणे? कसल्याश्या घाईत असल्यासारखा! तो म्हणाला म्हणून ह्या महागड्या कॉफीशॉप मध्येआलो. नाहीतर मला तर चहाच बरा वाटतो. आणि आता ह्याला कसली घाई झालीय?
“अरे ऐक… तुला कुठे जायचंय का? मला हि कॉफी जाणार नाही. आपण निघू शकतो.” मी टेबलावर ठकठक करत
म्हणाले.
“Ok! Ok!” त्याने स्वतःच्या तोंडावरून हात फिरवला आणि मोठा श्वास सोडला. बॅगमध्ये हात घातला आणि म्हणाला,
“हे बघ काय स्पष्ट सांग!
Will you be my girlfriend?” आणि फटकन एक गुलाबाचं फूल समोर केलं.
रडवेले डोळे पुसून,फूल घेऊन, हो म्हणून, कॉफी तशीच टाकून जेव्हा तिथून निघालो , तेव्हा त्याला विचारलं, “तुला
आवडती बायको आणि नावडती बायकोची गोष्ट माहितीय ?