Posts tagged Best kanosa story on dureghi

नागरिकशास्त्र (Nagarikshastr)

सातवीचा वर्ग, एक तास संपून दुसरा तास सुरु व्हायची मधली वेळ. त्या वेळात वर्गात किलकिलाट सुरु. मुलींची शाळा तर साहजिकच बोलायला विषय खूप असायचे.  वर्गाची “Class Representative” असूनही मी आणि माझ्या मैत्रिणीच्या गप्पांनाच ऊत आलेला. तशा वर्गातल्या सगळ्या मुली मैत्रिणीच. पण त्यात हि माझी खास मैत्रीण. आमच्या गप्पांना खंड नसायचा. शिक्षक वर्गावर आले तरी वहीवर लिहून गप्पा continue व्हायच्या.

असा साधारण scene असताना नागरिकशास्त्राचे सर वर्गात शिरले. “Goooood Afternoooon Siiiir!” असं उठून आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि बेंचवर बसलो.  काही शिक्षकांना तुकडी अ आणि तुकडी ब ह्यांना एकत्र करून syllabus संपवायचा होता. त्यामुळे एका बेंचवर तीन मुली बसल्या होत्या.

सरांनी नवीन धडा उघडायला सांगितलं आणि ते पुढे वाचू लागले. अचानक ते थांबले. आणि आम्हाला आडनावाने हाक मारून उभं केलं.

सर म्हणाले, “तुम्हाला काय वाटतं. तुम्ही चांगल्या घरातून येता म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांना कसंही वागवायचा अधिकार आहे?”

आम्हाला दोघींना काही कळेना. मग सरांनी माझ्याकडे मोर्चा वळवला. माझं आणि ह्या सरांचं फार पटायचं नाही. शाळेत असताना ‘खेळा’त सोडून सगळ्या गोष्टींत मी पुढे असायचे, तर ते त्यांना फारसं आवडायचं नाही. कदाचित त्यांना असं वाटत असेल कि माझ्यामुळे बाकीच्यांना संधी मिळत नाही. त्या दिवशी देखील ते अशाच अर्थाचं काहीतरी म्हणाले, “काय महाजन, काय वाटतं तुला? की तू नंबर काढतेस तर तू दुसऱ्यांशी कशीही वागू शकतेस?”

माझ्या डोळ्यात पाणी आलं, मी त्यांना विचारलं, “सर काय झालं? मी काय केलं?”

सर मैत्रिणीला म्हणाले, “तू तिथेच थांब आहेस त्या ठिकाणी.” आणि मला पुढे फळ्याजवळ  बोलवलं. मग ते म्हणाले, “आता इथून बघ काय दिसतंय, ती हणबरवाडीची मुलगी, ती कुठे बसलीय, आणि तुम्ही दोघींनी किती जागा घेतली आहे.”

मी बघितलं तर ती तिसरी मुलगी बेंचच्या एका कोपऱ्यावर बसली होती, आणि आमच्या गप्पांमध्ये मी आणि माझ्या मैत्रिणीने कधी २/३rd पेक्षा जास्त जागा घेतली होती ते आम्हाला कळलं नव्हतं.

मी डोळ्यातून गळणारं पाणी कसंबसं थांबवण्याचा प्रयत्न करून सरांना म्हणाले, “आम्ही मुद्दाम केलं नाही सर… आम्हाला कळलं नाही. तिने सांगितलं असतं तर आम्ही सरकून बसलो असतो.”

“हो… पण ती सांगणार कशी? वर्गातल्या फार शहाण्या मुली ना तुम्ही”

मी बाकावर कोपऱ्यात जाऊन बसले. तिसऱ्या मुलीला नीट जागा करून दिली आणि तो क्लास व त्यानंतरचे उरलेले क्लास खाली मान घालून नोट्स घेत संपवले.

घरी जाऊन हे सांगितलं तर आई म्हणाली, “उद्यापासून तू नीट बघून बसत जा.”

खूप वर्षांनी तो प्रसंग पुन्हा आठवला.

मला तेव्हा सरांचा राग आला होता खरा, आणि कदाचित सरांची सांगण्याची पद्धत चुकीची होती. किंवा बरोबरच असेल. काही अनुभव कडू लागल्याशिवाय मनावर कोरले जात नाहीत.

पण ते सांगत होते त्यात तथ्य होतं. आमच्या बाकावर बसलेली ती मुलगी एस.टी पकडून शाळेला येत असे. एवढंच नाही तर घरी भांडी-धुणी अशी कामं करत असे. ती स्वतःहून बहुधा आम्हाला बेंचवरच्या अडचणीबद्दल बोलली नसती.

आता लक्षात येतं की, बऱ्याचदा आपल्या bubble मध्ये राहून आपण दुसऱ्याला समजून घेण्यात कमी पडतो. स्वतःच्या जगात गुरफटून जाऊन दुसऱ्याबद्दल अनास्था कधी निर्माण होऊन जाते कळत नाही.
आणि आता त्या अनास्थेला सोशल मीडियाने छान फोडणी देऊन सजवलं आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल, विषयाबद्दल खोल माहिती नसताना त्यावर ‘कमेंट’ करण्याचं शस्त्र लोकांना मिळालं आहे. स्मार्टफोन व स्वस्त इंटरनेट वापरून अनेक ‘इंटरनेटवीर’ दर मिनिटाला जगाशी ‘विसंवाद’ साधत असतात. दुसऱ्याला समजून घेण्याची किंवा एखाद्या विषयाबद्दल पूर्णतः जाणून घेण्याची गरज उरली नाहीए. कुठल्याही व्यक्तीविषयी assumptions करून गरळ ओकण्याची मुभा मिळाली आहे.

दुसऱ्याला काय वाटेल ह्याचा तिळमात्र विचार न करणारी ही लोकं बघून असे काही स्वानुभव आठवतात.

असे अनुभव प्रत्येकाच्या गाठीला असतीलच असे नाही. पण दुसऱ्याच्या बूटात चालून कसं वाटतं हे आपल्याला माहित नाही, ह्याची फक्त जाणीव असणं पुरेसं आहे.
आपण बसलेल्या बाकावर स्वतः किती जागा घेऊन बसलोय हे पाहिलं तरी पुरेसं आहे.